छोट्यामोठ्या समस्यांनी त्रासलेल्या किंवा मनःशांतीच्या शोधात असणाऱ्या लोकांना जर कुणी सांगितलं, की मनःशांतीबरोबरच कौटुंबिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा एक सोपा उपाय आपल्याच वास्तूत दडलेला आहे, तर अशी माणसं नक्कीच तो उपाय करून पाहायला तयार होतात. अशांसाठीच पंडित रमेश पलंगे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुषमा पलंगे यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘लाभदायी वास्तुरचना’ या पुस्तकाचा परिचय............................
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात सामान्य माणसाला अनेक समस्यांनी ग्रासलेले असते. त्यातच चहूबाजूंनी सर्व प्रकारच्या माध्यमांतून नकारात्मक बातम्या आणि घडामोडींचा भडिमार होत असतो. त्यामुळे साहजिकच मग सामान्य माणूस जिथे कुठे थोडीफार सकारात्मक ऊर्जा मिळेल अशा ठिकाणांच्या शोधात असतो. कुणी एखाद्या स्वामी किंवा बुवांच्या भजनी लागतात...कुणी नित्यनेमाने जवळच्या देवळात जाणे सुरू करतात, तर कुणी नामस्मरण किंवा जपाचा अवलंब करू पाहतात. अशा त्रासलेल्या किंवा मनःशांतीच्या शोधात असणाऱ्या लोकांना जर कुणी सांगितलं, की मनःशांतीबरोबरच कौटुंबिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा एक सोपा उपाय आपल्याच वास्तूत दडलेला आहे, तर अशी माणसं नक्कीच तो उपाय करून पाहायला तयार होतात. आणि अशांसाठीच पंडित रमेश पलंगे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुषमा पलंगे यांनी घराची, कामाच्या ठिकाणच्या ऑफिसची, दुकानाची, कारखान्याची रचना वास्तुशास्त्राच्या आधारे बदलल्यास मिळणारे फायदे अतिशय सुलभ शब्दांत एका छोटेखानी पुस्तकाच्या रूपाने समोर आणले आहेत. ते वाचून आणि त्यात दिल्यानुसार आपल्या वास्तूत सर्व बदल केल्यास, नकारात्मक वातावरणामुळे वैतागलेला सामान्य माणूस एका वेगळ्याच सकारात्मक ऊर्जेची अनुभूती घेऊ शकेल असे हे पुस्तक वाचून वाटते.
वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय असते? आपण शाळेपासून ते कॉलेजपर्यंत अनेक प्रकारची शास्त्रे शिकलेली असतात; पण कधीही ह्या शास्त्राविषयी ऐकलेले नसते; पण हे शास्त्र आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपासून ज्ञात होते. निसर्गनियमांचा आणि पंचमहाभूतांचा अभ्यास करून, पृथ्वीचे भ्रमण, चुंबकीय तत्त्व वगैरे गोष्टींचा अभ्यास करून वास्तुरचनेसंबंधी काही नियम आणि निकष ठरवले गेले आहेत. त्या नियमावलीला ‘वास्तुशास्त्र’ असे म्हटले जाते.
प्रस्तुत पुस्तक लिहिण्याआधी पंडित पलंगे यांनी काही घरगुती बांधकामांचा अनुभव घेतला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की वास्तूचा आराखडा बनवताना वास्तुशास्त्राचे काही ठोकताळे पाळले तर अधिक फायदे होतात, त्रास कमी होतो, मनःस्ताप कमी होतात आणि म्हणून त्यांनी वास्तुशास्त्राचा रीतसर अभ्यास सुरू केला. भारतीय स्थापत्यकला, वेगवेगळे धर्मग्रंथ अभ्यासले, अनेक ऐतिहासिक वास्तूंना भेटी दिल्या, नकाशे, आराखडे तपासले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की हजारो वर्षांपासून त्या काळातल्या नगररचनाकारांनी, शिल्पकारांनी या शास्त्राचा वापर केल्याने त्या वेळी बांधलेली शिल्पे, मंदिरे, वास्तू, इमारती आजही इतक्या दिमाखात उभ्या आहेत आणि तिथे गेल्यावर एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. ‘त्या काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे,’ हे त्यावरूनच आले असावे. तात्पर्य हेच, की वास्तुशास्त्राला धरून आणि निसर्गनियमाप्रमाणे रचना केल्यास संपूर्ण विश्वातील सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि साहजिकच त्यायोगे प्रगती होत राहते.
सामान्य माणूस जमा केलेले लाखो रुपये खर्च करून, प्रसंगी कर्ज काढून स्वतःसाठी आणि पुढल्या पिढीसाठी वास्तू खरेदी करत असतो, ती लाभदायी, यशदायी, आनंददायी ठरावी अशी त्याची अपेक्षा असणे अगदी साहजिकच. त्यामुळे वास्तू खरेदी करतानाच किंवा बांधून घेत असतानाच काही नियम पाळले आणि काळजीपूर्वक अंमलबजावणी केली तर फायदा होणार हे नक्कीच!